| | | | | |

Our Contact No.

(022) 26592707

Our Helpline No.

155209

Home / Initiatives

नाविन्यपूर्ण योजनेतून बचत गटांच्या उत्पादनांसाठी मॉल : जयकुमार रावल


बचत गटांसाठीच्या प्रज्वला उपक्रमाचा नंदुरबार येथे शुभारंभ; महिलांचा मोठा प्रतिसाद नंदुरबार : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी नंदुरबार येथे मॉल उभारण्यात येईल, त्यासाठी प्रशासनाने तात्काळ सरकारी जागा उपलब्ध करून द्यावी, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, रोहयो, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे राज्य महिला आयोगातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रज्वला उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रज्वला योजनेच्या अध्यक्षा दिपाली मोकाशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बापूराव भवाने, गटविकास अधिकारी अशोक पटाईत आदी उपस्थित होते.

श्री.रावल म्हणाले, राज्यातील बचत गटांच्या उत्पादनांचे चांगले ब्रँडींग आणि पॅकेजींग करून त्यांना बाजारपेठ मिळवून देणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. आदिवासी भागातील पारंपरिक दागिने, आमचूर, पारंपरिक हस्तकला अशा उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळूवन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या नव्याने तयार होणाऱ्या ॲपच्या माध्यमातून बचत गटाच्या उत्पादनांची माहिती देण्यात येईल. पर्यटन विभागाच्या हाटच्या माध्यमातूनदेखील बचत गटांच्या उत्पादनांसाठी गाळे उपलब्ध करून देण्यात येतील.

महिलांचा विविध क्षेत्रातील सहभाग वाढावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी महिलांचे सबलीकरण महत्वाचे असून प्रज्वला अभियान हे त्यादिशने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. या अभियानाद्वारे महिलांना एकत्रित आणणे, त्यांचे संघटन, स्वावलंबन, आर्थिक नियोजन आणि विकास अशी प्रणाली तयार होते. या प्रणालीच्या माध्यमातून बचत गटांची महिलांना विकासाची संधी देणारी सक्षम व्यवस्था तयार होणार आहे.

प्रज्वला योजनेच्या माध्यमातून उत्पादनांचे विपणन चांगल्यारितीने होणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर महिलांच्या पारंपरिक कौशल्याला वाव देणे आवश्यक असून त्यासाठी पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासोबत विधवा, परितक्त्या आणि गरजू महिलांना धान्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री.रावल यांनी सांगितले.

खासदार गावीत म्हणाल्या, महिलांना कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रज्वला योजनेच्या माध्यमातून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर क्लस्टर तयार करून त्याद्वारे वस्तू उत्पादनाला सुरूवात करण्यात येणार आहे. राज्य महिला आयोगामार्फत या वस्तूंच्या विक्रीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हस्तकलेच्या वस्तुंना चांगली मागणी असून धडगाव येथे महूपासून जॅम आणि सरबत तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारचे अर्थसहाय्य मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आमदार गावीत यांनी महिला एकत्र आल्यास त्याचा अधिक लाभ होऊ शकेल असे सांगितले. शासनाचा चांगल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. महिलांनी एकत्र येऊन एकच उत्पादन केल्यास त्याला चांगली बाजारपेठ मिळू शकेल. मात्र त्यासाठी गुणवत्तेवरही भर द्यावा, असे ते म्हणाले.

श्रीमती मोकाशी यांनी प्रज्वला योजनेची माहिती दिली. तर राज्य आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे यांनी महिलांसाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची तर ॲड. उमा चौधरी यांनी कायदेविषयक माहिती दिली. तत्पूर्वी श्रीमती रहाटकर यांनी बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या स्टॉल्सला भेट दिली.

▪‘प्रज्वला’चा दुसरा टप्पादेखील नंदुरबारपासून सुरू करणार : विजया रहाटकर ‘प्रज्वला’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षीत करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात क्लस्टरद्वारे उत्पादन करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यातूनच करण्यात येईल, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली. त्या म्हणाल्या, प्रजवला योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण, दुसऱ्या टप्प्यात क्लस्टरनिर्मिती व बाजारपेठ उभारणे व तिसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थेने जागा उपलब्ध करून दिल्यास प्रज्वला बचत गट बाजाराची उभारणी करण्यात येणार आहे. राज्यातील 60 लाख महिलांनी 3 लाख बचत गट उभे केले असून या सर्व महिलांना या अभियानाच्या माध्यमातून स्वावलंबी करावयाचे आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना मार्केटींगचे तंत्र देण्यात येणार आहे. महिलांनी आत्मविश्वासाने या अभियानात सहभागी व्हावे. महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. कुटुंब सक्षम होण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण महत्वाचे आहे. म‍हिला छोटी बचत करून कुटुंब सक्षम करू शकतात. महिलांनी पैसा टिकवून मुलांचे शिक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील 288 विधानसभा क्षेत्रात हे अभियान पोहोचविण्यात येणार असून सर्वांनी मिळून बचत गटाची चळवळ पुढे न्यावी. म‍हिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य महिला आयोगाचे सर्व सहकार्य राहील, अशी ग्वाही श्रीमती रहाटकर यांनी दिली.


u-1
u-2
u-3

u-4
u-4
u-4

u-4
u-4
u-4